भारतीय इतिहासलेखन: अशोकाच्या शिलालेखांपासून राजवाडे, कोसंबी आणि स्त्रीवादी इतिहासकारांपर्यंतचा प्रवास. प्राचीन स्रोत, मध्ययुगीन बखरी आणि आधुनिक संशोधन
२.१ भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल :
(१) प्राचीन काळातील इतिहासलेखन :
- प्राचीन भारतात पूर्वजांचे पराक्रम, दैवते यांच्या स्मृती मौखिक परंपरेने जपल्या जात असत.
- पाच हजार वर्षांपूर्वीच्या हडप्पा संस्कृतीत लेखनकला अस्तित्वात होती, परंतु त्या लिपीचे वाचन करण्यात अजूनही यश मिळालेले नाही.
- भारतातील सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे नाणी, मूर्ती, शिल्प, ताम्रपट व शिलालेख इत्यादींवरील कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे.
- मौर्य सम्राट अशोक याच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकापासून भारतीय लेखनकलेची सुरुवात होते.
(२) लिखित साधने :
प्राचीन भारताच्या इतिहासाची लिखित साधने
- पुराणे व अन्य धर्मग्रंथ
- रामायण व महाभारत यांसारखी महाकाव्ये
- जैन व बौद्ध धर्मग्रंथ
- परकीय प्रवाशांची प्रवासवर्णन
(३) प्राचीन लिखित साधनांतून मिळणारी माहिती :
- विशिष्ट काळातील राजांची वंशावळ, राजकीय घडामोडी वः शासनव्यवस्था.
- तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, नैसर्गिक संकटे इत्यादी.
- त्या काळातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक व सांस्कृतिक जीवन.
- बाणभट्टाच्या 'हर्षचरित' या संस्कृत काव्यातून सातव्या शतकातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक जीवनाचे वास्तववादी चित्रण वाचायला मिळते.
(४) कल्हण :
- याने १२ व्या शतकात 'राजतरंगिणी' हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ लिहिला.
- इतिहासलेखन शास्त्रशुद्ध कसे असावे, हे या ग्रंथावरून दिसते.
- तत्कालीन नाणी, कोरीव लेख, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा यांचा अभ्यास करून हा ग्रंथ तयार झाला आहे.
राजतरंगिणी :
कल्हण या विद्वानाने बाराव्या शतकात खंडकाव्य स्वरूपात लिहिलेला काश्मीरचा इतिहास व वर्णन म्हणजे 'राजतरंगिणी' हा ग्रंथ होय. या ग्रंथाची रचना संस्कृत भाषेत असून तो आठ तरंगांमध्ये विभागलेला आहे. ग्रंथात एकूण ४३७७ श्लोक आहेत. हा ग्रंथ भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरचा भूगोल समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतो. कल्हण पंडिताने येथे होऊन गेलेल्या प्रत्येक राजाचे गुण व दोष वर्णन केले आहेत. महाभारतातील पहिल्या गोनर्द राजापासून अकराव्या शतकातल्या हर्षापर्यंत सुमारे ४००० वर्षांपर्यंतचा काश्मीरचा इतिहास या ग्रंथात वाचायला मिळतो. काश्मीरच्या वास्तववादी इतिहासलेखनामुळे राजतरंगिणी हा ग्रंथ प्राचीन भारतीय इतिहासाच्या साधनांतील एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो.
सोहगौडा ताम्रपट :
- उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्हयात सोहगौडा येथे ब्राहमी लिपीत लिहिलेला एक मौर्यकालीन ताम्रपट सापडला आहे.
- त्यावर वृक्ष, पर्वत, धान्याचे कोठार अशी चिन्हे कोरलेली आहेत.
- कोठारातील धान्य जपून वापरण्याचा आणि दुष्काळाच्या वेळी कशी काळजी घ्यावी या संदर्भातील हे आदेश असावेत, असे मानले जाते.
(५) मध्ययुगीन काळातील इतिहासलेखन :
(अ) मुस्लीम इतिहासकार :
- इतिहासकाराचे नाव : झियाउद्दीन बरनी
- ग्रंथाचे नाव : तारीख-इ-फिरुजशाही
- माहिती / विचार : बरनीने सांगितलेले इतिहासलेखनाचे हेतू
(१) राजांच्या पराक्रमाचे व कल्याणकारी धोरणांचेच वर्णन पुरेसे नाही.
(२) राजांच्या दोषांचे व चुकीच्या धोरणांचे विवेचनही करावे.
(३) तत्कालीन विद्वान व्यक्ती, साहित्यिक, संत अशा व्यक्तींच्या सामाजिक प्रभावाचेही वर्णन करावे.
- इतिहासकाराचे नाव : बाबर (मुघल साम्राज्याचा संस्थापक)
तुझुक-इ-बाबरी(आत्मचरित्र) या आत्मचरित्रात पुढील माहिती दिलेली आहे-
(१) त्याने केलेल्या युद्धांची वर्णने,
(२) प्रवास केलेल्या प्रदेशांची व शहरांची वर्णने.
(३) स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज व वनस्पतीसृष्टी.
- अबुल फजल : अकबरनामा
ग्रंथाची वैशिष्ट्ये
(१) अधिकृत नोंदींच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन..
(२) मिळालेल्या माहितीची विश्वासार्ह छाननी.
(३) पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी संशोधन पद्धती होती असे मानले जाते. - हसन निजामी लिखित - ताजुल-मासिर,
- मिन्हाज-इ-सिराज लिखित - तबाकत-इ-नासिरी,
- अमीर खुस्रो याचे विपुल लेखन,
- तैमूरलंग याचे आत्मचरित्र - तुझुक-इ-तिमुरी
- याह्या बिन अहमद सरहिंदी लिखित - तारीख-इ-मुबारकशाही यांसारखे ग्रंथ महत्त्वाचे आहेत.
त्यांच्या लेखनातून आपल्याला भारतातील मध्ययुगीन कालखंडासंबंधी महत्त्वाची माहिती मिळते.
परदेशी प्रवाशांनी लिहून ठेवलेले वृत्तांतही भारताच्या इतिहासाची महत्त्वाची साधने आहेत.
इब्न बतूता, अब्दुल रझ्झाक, मार्को पोलो, निकोलो कॉन्ती, बार्बोसा आणि डॉमिंगोस पेस हे त्यांपैकी होत. त्यांच्या लेखनातून मध्ययुगीन भारतासंबंधीची ऐतिहासिक माहिती मिळते.
ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना, खाफी खान आणि निकोलाय मनुची हे बादशाह औरंगजेबच्या काळातील इतिहासकार होते. मुघल काळातील इतिहास समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन अत्यंत महत्त्वाचे आहे.
अल् बेरूनी (४ सप्टेंबर ९७३ - डिसेंबर १०४८) :
मध्य आशियातील एक प्रसिद्ध मुसलमान इतिहासकार व तत्त्वचिंतक. त्याने चंद्रग्रहण पाहून निरीक्षणात्मक माहिती लिहिली. कालगणनेवर ग्रंथ लिहिला. मुहम्मद गझनीच्या पहिल्या स्वारीच्या वेळी (इ.स. १०२२) अल् बेरूनी मुहम्मदाबरोबर भारतात आला. त्याने भारतभर प्रवास करून संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला. 'तारीख-ए-हिंद' या ग्रंथात त्याने भारतातील तत्कालीन स्थितीचे सर्वांगीण वर्णन केले आहे. त्याने मुहम्मदाच्या भारतावरील स्वाऱ्यांवर टीका केली आहे. त्याने पतंजलीच्या 'योगसूत्रा'चे व कपिलमुनींच्या 'सांख्य' इत्यादी संस्कृत ग्रंथांचे अनुवाद अरबी भाषेमध्ये केले. त्याने १५० ग्रंथ लिहिले असे म्हणतात. परंतु त्यांतील २७ ग्रंथच आज उपलब्ध आहेत.
(ब) मुस्लीम इतिहासकारांच्या लेखनाची वैशिष्ट्ये :
- मध्ययुगीन भारतामधील मुस्लीम इतिहासकारांच्या लेखनावर अरबी व फारसी इतिहासलेखनाचा प्रभाव होता.
- मुघल राज्यकर्त्यांची स्तुती व त्यांच्याशी असलेली निष्ठा या इतिहासलेखनातून व्यक्त होते.
- त्यांनी इतिहासलेखनात समर्पक पदय उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धत सुरू केली.
बखर :
'बखर' या शब्दाचा कोशातील अर्थ आहे- हकीकत, बातमी, इतिहास, कथानक, चरित्र. 'खबर' या फारसी शब्दापासून तो बनला असावा. ज्या काळात मराठीवर फारसी भाषेचा प्रभाव होता, त्याच काळात मराठीत बखरी लिहिल्या गेल्या. ऐतिहासिक साहित्यातील एक गदय लेखनप्रकार म्हणून बखरींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तर पेशवाईत इ. स. १७६० ते १८५० या दरम्यान सुमारे २०० बखरी लिहिल्या गेल्या. पानिपतच्या युद्धावर आणि शिवाजी महाराजांवर अनेक बखरी लिहिलेल्या आढळतात. बखरीतून तत्कालीन लोकस्थितीचे वर्णन असते, तसेच इतिहासही असतो; परंतु इतिहासातील काटेकोरपणा त्यात नाही. शिवरायांचे, भाऊसाहेब पेशव्यांचे वा पानिपतच्या युद्धाचे वर्णन बखरकार अतिरंजितपणेही करताना दिसतो. त्यातून त्याची उत्तम निवेदनशैली दिसते. बखरीतील आलंकारिक वर्णने, सुभाषितांचा वापर, सुविचारवजा वाक्ये, वीररस वा शोकात्मरसपूर्ण वर्णने यांमुळे बखरींकडे इतिहासापेक्षा मराठी गदय साहित्याचा एक प्रकार म्हणूनच पाहिले जाते.
- ‘बखर’ हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे यांविषयीचे लेखन आपणांस बखरीत वाचायला मिळते.
- मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यांतील एक महत्त्वाची बखर ‘सभासद बखर’ होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती यातून मिळते.
- ‘भाऊसाहेबांची बखर’ या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. याच विषयावर आधारित
- ‘पानिपतची बखर’ अशीही स्वतंत्र बखर आहे.
- ‘होळकरांची कैफियत’ या बखरीतून आपणांस होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते.
बखरींचे प्रकार
चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत,पौराणिक आणि राजनीतिपर असे प्रकार आहेत
आधुनिक काळातील इतिहासलेखन आणि ब्रिटिश इतिहासकाळ :
- विसाव्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्त्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली.
- भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले.
- त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले.
- जॉन मार्शल याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी तिसऱ्या सहस्रका 3000 हजार पर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाऊ शकतो हे सिद्ध झाले.
- भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला दिसतो.
- जेम्स मिल याने लिहिलेल्या ‘द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया’ या ग्रंथाचे तीन खंड १८१७ साली प्रसिद्ध झाले.
* ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ.
* त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव
* भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंसंबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. - सन १८४१ मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी ‘द हिस्टरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ लिहिला.
माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर (१८१९-१८२७) होते.
- भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे.
* मराठीसाम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँट डफ याचे नाव महत्त्वाचे आहे
* ‘ए हिस्टरी ऑफ द मराठाज्’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे तीन खंड आहेत. भारतीय
* संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रँट डफ याच्या लेखनातही उमटलेली दिसते. - अशीच प्रवृत्ती
* राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉडसारख्या अधिकाऱ्याच्या लेखनात आढळते.
* विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यामध्ये त्याची निःपक्षपाती वृत्ती दिसते.
* डफ याच्या इतिहासलेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि वि. का. राजवाडे यांनी एकोणिसाव्या शतकात दाखवून दिल्या.
भारतीय इतिहासलेखन : विविध तात्त्विक प्रणाली
वसाहतवादी इतिहासलेखन :
- भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारक यांचा समावेश होता.
- भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे, या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्या इतिहास लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते.
- वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहासलेखनाचा वापर केला गेला.
- १९२२ ते १९३७ च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले ‘केंब्रिज हिस्टरी ऑफ इंडिया’ या ग्रंथाचे पाच खंड हे वसाहतवादी इतिहासलेखनाचे ठळक उदाहरण आहे.
प्राच्यवादी इतिहासलेखन :
- युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत होऊन ज्या इतिहासकारांनी लेखन केले त्यांना त्याना प्राच्यवादी इतिहासकार म्हणतात.
- पूर्वेकडील संस्कृती बद्दल आदर, कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी म्हटले जाते.
- प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता.
- भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो-युरोपीय भाषा होती, अशी कल्पना मांडली गेली.
प्राच्यवादी इतिहासकार
1. सर विल्यम जोन्स
इसवी सन १७८४ मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांच्या अभ्यासास चालना मिळाली.
2.फ्रेडरिक मॅक्सम्युलर
- संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता.
- त्याच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो-युरोपीय भाषागटातील अतिप्राचीन शाखा होती.
- त्याने ‘हितोपदेश’ या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला.
- तसेच ‘द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट’ या नावाने ५० खंड संपादित केले.
- त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. ते सहा खंडांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.
- त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला होता.
अलीकडच्या काळात प्राच्यविद्यावंतांच्या लेखनामागील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद या विद्वानाने केले.
राष्ट्रवादी इतिहासलेखनः
एकोणिसाव्या- विसाव्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षणपद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहासलेखन असे म्हटले जाते.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा
मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधण्याचा प्रयत्न केला.
राष्ट्रवादी इतिहासकार :
महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र, रमेशचंद्र मजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधाकुमुद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णु मिराशी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणा दाखल देता येतील.
न्या.महादेव गोविंद रानडे : ‘द राईज ऑफ द मराठा पॉवर’ या ग्रंथात मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी विस्ताराने मांडली. मराठी सत्तेचा उदय म्हणजे अचानक पेटलेला वणवा नसून त्याची सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रांतील तयारी बराच काळ महाराष्ट्रात चालू होती, हे त्यांनी आपल्या या ग्रंथात सांगितले.
वि.का.राजवाडे
- इतिहासलेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत.
- आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे, याचा पुरस्कार त्यांनी केला.
- ‘मराठ्यांच्या इतिहासाची साधने’ असे शीर्षक असणारे २२ खंड त्यांनी संपादित केले. त्यांतील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यास पूर्ण आहेत.
- ‘‘इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकिकती नव्हेत’’, असे त्यांचे मत होते.
- अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.
- इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी वि.का.राजवाडे यांनी पुण्यात ७ जुलै १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापन केल.
- ‘‘मानवी इतिहास काल व स्थल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले म्हणजे त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कालावर व विशिष्ट स्थलावर पसरवून दाखवला पाहिजे. काल, स्थल व व्यक्ती या त्रयीची जी सांगड तिलाच प्रसंग वा ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते.’’
स्वातंत्र्यवीर सावरकर
- भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहासलेखनाचा उपयोग झाला.
- स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांनी लिहिलेले ‘द इंडियन वॉर ऑफ इन्डिपेन्डन्स 1857’ (१८५७ चे ‘स्वातंत्र्यसमर’) या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे.
- राष्ट्रवादी इतिहासलेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली.
- दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले.
स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासलेखनः
- एकीकडे राजघराण्यांच्या इतिहासावर भर देणारे इतिहासलेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली होती.
- स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली.
- या काळातील इतिहासलेखनात प्रामुख्याने तीन नवे वैचारिक प्रवाह आढळतात.
(१) मार्क्सवादी इतिहास
(२) वंचितांचा (सबऑल्टर्न) इतिहास
(३) स्त्रीवादी इतिहास
मार्क्सवादी इतिहास :
- मार्क्सवादी इतिहासकारांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार मध्यवर्ती होता.
- प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहासलेखनाचे महत्त्वाचे सूत्र होते.
- मार्क्सवादी इतिहासकारांनी जातिव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला.
- भारतामध्ये मार्क्सवादी इतिहासलेखन पद्धतीचा अवलंब प्रभावी रीतीने करणारे इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, रामशरण शर्मा, कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचे योगदान महत्त्वाचे आहे.
डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. त्यांचे ‘प्रिमिटिव्ह कम्युनिझम टु स्लेव्हरी’ हे पुस्तक मार्क्सवादी इतिहासलेखनाचे उदाहरण आहे.
वंचितांचा (सबऑल्टर्न) इतिहासः
- वंचित समूहांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतूनच झाली, असे म्हणता येईल.
- इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे, ही कल्पना मांडण्यामध्ये अँटोनिओ ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञाचे स्थान महत्त्वाचे आहे.
- वंचितांचा इतिहास लिहिण्यासाठी लोकपरंपरा हेएक महत्त्वाचे साधन मानले गेले आहे. वंचितांच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने केले.
- भारतामध्ये वंचितांच्या इतिहासाचा विचार महात्मा जोतीराव फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातून मांडलेला दिसतो.
- महात्मा फुले यांनी ‘गुलामगिरी’ या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला.
- धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र व अतिशूद्र यांच्या होणाऱ्या शोषणाकडे लक्ष वेधले.
- भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय घडणीत दलित वर्गाचा मोठा वाटा आहे. भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहासलेखनात त्याकडे दुर्लक्ष केले गेले.
- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ही गोष्ट केंद्रस्थानी ठेवून सतत लेखन केले.
- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या विपुल लेखनापैकी ‘हू वेअर द शूद्राज’ आणि ‘द अनटचेबल्स्’ हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येतील.
स्त्रीवादी इतिहास :
- भारतीय इतिहासलेखनाच्या क्षेत्रात सुरुवातीस प्रामुख्याने पुरुष अभ्यासक कार्यरत असल्यामुळे भारतीय इतिहासातील स्त्रियांचे स्थान आणि त्यांची कामगिरी हा विषय तुलनेने दुर्लक्षित राहिला होता.
- त्यावर अधिक प्रकाश टाकणे हे स्त्रीवादी इतिहासकारांपुढे पहिले आव्हान होते. तसेच स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन आणि संकलन करणेही आवश्यक होते.
- इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा विचार नव्याने होणे आवश्यक होते.
- एकोणिसाव्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी आहे. त्यांनी पुरुषप्रधान व्यवस्था आणि जातिव्यवस्था यांना विरोध करणारे लेखन केले.
- सन १८८२ मध्ये प्रसिद्ध झालेले ‘स्त्रीपुरुष तुलना’ हे त्यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते.
- सन १८८८ मध्ये पंडिता रमाबाई यांचे ‘द हाय कास्ट हिंदु वुमन’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले.
- स्वातंत्र्योत्तर काळात झालेले लेखन स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी मिळणारी वागणूक, त्यांचा राजकीय समतेचा हक्क यांसारख्या विषयांवर केंद्रित झालेले दिसते.
- अलीकडच्या काळात प्रसिद्ध झालेल्या स्त्रीवादी लेखनात मीरा कोसंबी यांच्या ‘क्रॉसिंग थ्रेशोल्डस् फेमिनिस्ट एस्सेज इन सोशल हिस्टरी’ या पुस्तकाचा उल्लेख करता येईल.
- त्यात महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांसारख्या स्त्रियांच्या जीवनावरील निबंध आहेत.
- महाराष्ट्रामध्ये दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात लेखन केले गेले.
- त्यामध्ये शर्मिला रेगे यांचे लेखन महत्त्वाचे आहे. ‘रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर रिडिंग दलित वुमेन्स् टेस्टिमोनीज यामध्ये दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधांचे संकलन आहे.विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिणारे :
- सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार गो.स.सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्ख करावा लागतो.
- अलीकडच्या काळात य.दि.फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहासलेखनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
COMMENTS